
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अर्बन नक्षली चळवळ चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले.
मल्लिकार्जून खरगे म्हणाले, “जे बुद्धीवादी आहेत, त्यांना अर्बन नक्षल म्हणत आहेत. काँग्रेसला म्हणत आहेत. ही त्यांची सवय आहे. त्यांचा स्वतःचा पक्ष दहशतवाद्यांचा पक्ष आहे. लिंचिंग करतात, मारतात. अनुसूचित जातीच्या लोकांच्या तोंडात लघवी करतात. आदिवासींना आणून त्यांच्यावर बलात्कार करतात. दहशतवादी पक्ष तर त्यांचा आहे”, असा पलटवार खरगेंनी मोदींच्या टीकेला उत्तर देताना केला.
पुढे खरगे म्हणाले, “जे लोक हे सगळं (अत्याचार) करतात, त्यांना हे लोक (भाजप) पाठिंबा देतात. वरून दुसऱ्यांना बोलतात. मोदींना तर अधिकारच नाही. त्यांची सरकारे जिथे-जिथे आहेत. तिथे मागास लोकांवर अत्याचार होतात. विशेषतः आदिवासींवर अत्याचार होतात. वरून ही गोष्टी तेच बोलतात की, बघा तुमच्यावर (आदिवासींवर) हल्ले होतायेत. सरकार आमचं आहे का? तुमचं सरकार आहे, तुम्ही नियंत्रित करू शकता. पण, मोदींची सवय आहे, असेच बोलतात”, अशा शब्दात खरगेंनी मोदींकडून केलेल्या जाणाऱ्या अर्बन नक्षल टीकेला उत्तर दिले.
काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा हरयाणातील सत्तेपासून दूर राहावं लागलं. सत्तेने हूलकावणी दिल्यानंतर या निकालाबद्दल बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले, “हरयाणामध्ये जे काही झालं आहे, आम्ही त्यासंदर्भात बैठका घेत आहोत. अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल की, काय करण्याची गरज आहे आणि हे असं कसं घडलं? पूर्ण देश आणि इतकंच नाही, तर भाजपाही म्हणत होती की, काँग्रेस जिंकणार; तरीही अशी कोणती कारणं आहेत, ज्यामुळे काँग्रेस पराभूत झाली? विजयानंतर अनेक लोक श्रेय घेतात, पराभवानंतर अनेक लोक टीका करतात”, असे भाष्य खरगेंनी केले.