तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका, कराड शरणप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांना सुनावले
पुणे : २२ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराड यांने पुणे सीआयडीमध्ये आत्मसमर्पण केले. त्यसानंतर त्याचे हे आत्मसमर्पण पूर्णपणे ठरवून केले असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या विषयावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले. ते भिमा कोरेगाव येथे आले होते.
प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की, शरण आलेला वाल्मिक कराडवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारवर मोठा दबाव आहे. बीड मधील घटनेत जातीय रंग देण्यात आले, तेही चुकीचे आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 1 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
पोलीस खात्याचे अपयश वारंवार समोर येतं…
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाल्मिक कराड याच्या शरणागतीवर आश्चर्य व्यक्त केले. वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार होता. पोलीस आणि सीआयडीला त्याचा शोध घेता आला नाही, अखेर तो स्वतः सीआयडीला शरण आला. पोलीस आणि सीआयडीला वाल्मिक कुठे लपला हे माहित नव्हते याचे आश्चर्य वाटते. यातून पोलीस खात्याचे अपयश दिसून आल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. गुप्तचर यंत्रणांचे अपयश वारंवार समोर आले आहे अशी टीप्पणीही त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा रंग दिला जात आहे, तेही चुकीचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
विषमता प्रत्यक्षरित्या संपली, मानसिकरित्या सुरु
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला आजही लाखो अनुयायी येतात, याचाच अर्थ समजातील विषमता अणि अमानुष वागणुकीचा हा लढा फिजिकली संपला आहे, मात्र मानसिकरित्या सुरु आहे. परभणी आणि बीडची घटना घडली, मानसिक बदल न झाल्यामुळे अशा घटना घडतात. मानवतावादी लढा ज्यांनी उभा केला, त्यांनी परत पुढं यावं म्हणजे हा संघर्ष संपेल. तो जो पर्यंत हा लढा सुरु राहील लोकं अभिवादन करण्यासाठी येत राहतील, असं विजयस्तंभ अभिवादानानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथील 207 व्या शौर्य दिनाच्या आयोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी मी आलो आहे. सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत असते, ही गोष्ट चांगली आहे. सरकार आपल्या परीने सुविधा पुरवत असते, पण या अपुऱ्या पडत आहेत. पुढच्या वर्षी या सुविधा पुरवल्या जातील अशी अपेक्षा आहे. बार्टीसारख्या संस्था यात लक्ष घालतील, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.