राष्ट्रपती पदक सन्मानित निवृत्त पोलीस उपअधीक्षक रंगनाथ मुसळे यांचे निधन

धाराशिव :- तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील राज्य राखीव पोलिस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेले निवृत्त पोलिस उपअधीक्षक रंगनाथ मुसळे (वय ८० वर्षे) यांची सोलापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अल्झायमर या आजारावर उपचार सुरु असतानाच (दि.५) रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी गंधोरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, चार बहिणी, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंड असा परिवार असून एक मुलगा वकील आणि एक मुलगा प्राध्यापक आहे.
शांत, संयमी, मनमिळावू स्वभाव आणि एक शिस्तप्रिय, निष्ठावंत व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. त्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पहिले राष्ट्रपती पदक हे १९८९ साली व दुसरे १९९७ ला देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यावेळचे तत्कालीन मंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मंडल आयोगाचे आंदोलन सुरु असताना त्यांनी एकट्याने एक दंगल रोखली होती, राज्यातील पहिले नक्षलविरोधी पथक त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले. नक्षलवादी बंदोबस्ताच्या काळात जि.चंद्रपूर, वणी या गावात त्यांनी श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन करून दिली. आणि गावकऱ्यांना भक्तिमार्गास लावून नक्षल चळवळीपासून मुक्त केले. विशेष म्हणजे कुस्तीच्या आवडीतून कमावलेले शरीर त्यांनी देशसेवा करण्यासाठी खर्च केले.
त्यांच्याबद्दल थोडक्यात…
१२ जून १९४४ रोजी जन्मलेल्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र, एक ‘कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी’ म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रिटायर्ड डि.वाय.एस.पी. रंगनाथ माधवराव मुसळे हे हलाखीच्या परिस्थितीवर मात करत निव्वळ सातवी शिक्षण झालेले रंगनाथ घरातून पळून जाऊन जालना येथे पोलिस भरती होतात.
अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि कष्टाळू आणि आयुष्यभर निर्व्यसनी राहिलेले असे व्यक्तिमत्व सतत काही ना काही नवीन शिकत त्यांनी आपल्या नोकरीत शिपाई पदापासून डिवायएसपी पदापर्यंत वाटचाल केली. त्या दरम्यान त्यांना दोनदा राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले. घर कुटूंबासोबत सामाजिक भान जपत पुढील पिढीसाठी अनेक कुटुंबांचे भविष्य संरक्षित केले. त्यांनी स्वतःचे आत्मचरित्रपर पुस्तक ‘कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी रंगनाथ मुसळे’ हे प्रकाशित केले.
त्यांच्या जीवनातील अनेक प्रेरक घटना, अनुभवाचे बोल खुप काही शिकवून जातात. अशा धडाडी, जिद्दी, तल्लख बुद्धी असलेल्या रंगनाथ मुसळे यांना निवृत्ती नंतर २० वर्षांनी अल्झायमर या आजाराने ग्रासले. साधारण दहा वर्षापूर्वी पत्नीचे अन्ननलिकेच्या कॅन्सरने निधन झाले तेव्हा ते खचले, हळूहळू एकटे राहू लागले, बडबड करणे आणि रस्ते, व्यक्ती यांची ओळख विसरून गेले. हळुहळु त्यांना विस्मरणाचा त्रास होऊ लागला. याच आजारपणात त्यांचे दु:खद निधन झाले.