लाडकी बहीण योजनेचे 2100 कधी मिळणार, भाजपने स्पष्टच सांगितले
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्याा तोंडावर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. जुलैपासून या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत. आता डिसेंबर महिन्याचे पैेसे कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
राज्यात महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल, असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता, याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे, अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाहीये. लाडक्या बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत, तेच कायम राहणार आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये १५०० वरुन २१०० रुपये वाढ करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर यात वाढ होणार आहे, पण यासाठी लाडक्या बहिणींना काही महिने वाट पाहावी लागणार आहे. पण किती काळ वाट पाहावी लागेल? याचं उत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
असा कोणीही तर्क काढला नाही. मला मुलाखतीत विचारलं, 2100 रुपये कधी वाढणार. मी त्यांना म्हटलं, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. बजेटमध्ये वाढवायचं, रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. पुढच्या वर्षात निश्चितपणे वाढेल, इतकीच प्रतिक्रिया मी दिली. पण काही लोकांनी त्याचा विपर्यास केला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये करण्याचे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात आहे. पैसे वाढवले नाहीत तर मी स्वत: पत्र लिहेन. मी आग्रह करेन, हे पैसे दिले पाहिजे. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकल रीत सदा चले आये, प्राण जाये पर वचन न जाए, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.