मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटात नाराजीनाट्य… आपण बिहारच्या मार्गाने चाललोय : नेत्याचा हल्लाबोल
मुंबई : महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. यामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाला ११ मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रीपदे देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून होते. पण मंत्रीपद न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आपण बिहारच्या मार्गान चाललोय असल्याची खंत शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली तर श्रध्दा आिण सबुरी ठेवण्याचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना दिला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे
“माझ्यासाठी मंत्रिपद इतकं महत्त्वाचं नाही. मला लोकांनी निवडून दिलंय, मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. पण दु:ख एवढंच आहे की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? तुम्हाला विभागीय दिले जायचे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यासारख्या लोकांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. आपण कुठे तरी आता मागे चाललोय. आपण बिहारच्या मार्गाने चाललोय. मला नाव कट झाल्याबद्दल अजिबात दु:ख नाही. पण ज्यापद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवं, पण ते न झाल्याने नाराजी १०० टक्के आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला गरज नाही. माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री आणि इतरांकडून करुन घेणे, इतकंच आहे. मंत्रिपदावरुन मला राग नाही. पण वागणुकीवरुन प्रचंड राग आहे”, असे विजय शिवतारे यांनी म्हटले.
श्रध्दा आणि सबुरी ठेवा : एकनाथ शिंदे
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदावरुन नाराज झालेल्यांवरही भाष्य केले आहे. मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार केला जाईल. श्रध्दा आणि सबुरी ठेवा. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल. योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.