तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही; बीड जिल्ह्याला शिस्त लागणे तुमच्याच फायद्याचे : अजित पवार
बीड जिल्ह्यात जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होईल. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील. तुमच्याकडे पवनचक्की, सौरउर्जेचे काही प्रकल्प येत आहेत. या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते. पालकमंत्री पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिल्याच बीड दौरा होता. ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले आहेत. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा थेट इशारा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. यानंतर आता अजित पवार अॅक्शनमध्ये आले आहेत.
अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, ‘माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे यावर माझा भर असतो. या कामांमध्ये जर वेडेवाकडे काम केले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा आहे की लांबचा हे मी पाहणार नाही. विकासाची काम करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या ते कानावर आल्यानंतर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.’ असा थेट इशारा अजित पवारांनी दिला.
“प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे. हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलं. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्या. तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन. पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई करणार”, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला.