नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना नवी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठीच शरद पवार यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. अशा परिस्थितीत मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण पत्र देण्यासाठी शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.काही दिवसांपूर्वीच यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले होते. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
#WATCH | Delhi: NCP-SCP chief Sharad Pawar met PM Narendra Modi today in the Parliament regarding pomegranate issue of farmers.
Visuals as he leaves from the Parliament. pic.twitter.com/5diMYHVCno
— ANI (@ANI) December 18, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी, “डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. या भेटी दरम्यान , शरद पवार यांच्यासह साताऱ्यातील दोन शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना डाळिंबाची भेट देखील दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवारांना विचारण्यात आले की, महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली का? तर त्यांनी स्पष्टपणे नकार देत अशो कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.
म्हणून ही भेट महत्त्वाची
शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याच सांगितलं आहे. शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट होती. पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात महायुतीच सरकार सत्तेवर आल्यानंतर नवीन समीकरण जुळतील असं चित्र दिसू लागलय. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस झाला. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेले त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरु झालीय. म्हणून शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट महत्त्वपूर्ण ठरते.