…तर शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचे नांव घेण्याचा अधिकार नाही; मस्साजोग प्रकरणावरुन किरण मानेची पोस्ट
मुंबई : अभिनेते किरण माने त्यांच्या अभिनयासोबतच सामाजिक भूमिकेसाठी ओळखले जातात. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनेची ते आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून नेहमीच टीका करतात. अशातच अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांनी आपल्या पोस्टमधून भाष्य केले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण अलीकडे चर्चेत आहे. अलीकडेच शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तर अजित पवारांनीदेखील देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.
देशमुख यांचे कुटुंबीय या घटनेनंतर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. घरचा कर्ता पुरुष आणि गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी गमावल्याने हळहळ व्यक्त केली जातेय, तर याप्रकरणातील मुख्य आरोपीला कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यानंतर आता किरण माने यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.
काय म्हणाले सोशल मिडीयावर अभिनेता किरण माने…
“घड्याळवाल्या माझ्या जिवलग कार्यकर्ता मित्रांनो… इडीच्या धाकानं दादा तिकडं गेले आणि दादांचा एक ‘निष्ठावान कार्यकर्ता’ म्हणून तुम्हालाही नाईलाजानं तिकडं जावं लागलं. आपण दूर झालो पण तुटलो नाही. विचारधारांच्या लढाईत एकेकाळी आपण एकत्र होतो, अजूनही आपण संपर्कात असतो. माझ्या वैयक्तिक संघर्षातही तुम्ही मला जीवापाड साथ दिलेली मी विसरलेलो नाही, हे तुम्हालाही माहिती आहे.
दादांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनो, संतोष देशमुखही तुमच्यासारखाच सर्वसामान्य घरातला पोरगा. आपल्या कर्तृत्वानं एक आदर्श सरपंच ठरला. तो अतिशय घृणास्पद पद्धतीनं मारला गेलाय राव! शरीराचा एक अवयव नाही जिथे जखम नाही. काही अवयवांच्या चिंध्या झालेल्या आहेत. डोळे जाळले आहेत. पक्षबिक्ष बाजूला ठेवून या घटनेकडं बघा. त्याची बायको, मुलगी, भाऊ, ‘लाडकी बहीण’, आई, वडील यांच्या ठिकाणी स्वत:चं कुटुंब आहे असा विचार करा. ‘माणूस’ या नात्यानं सगळं बघा.
…भावांनो, आपण भक्ताडांसारखी गिधाडं नाही आहोत. ते रक्तच नीच वृत्तीचं आहे. आपण त्यांच्यासारखे दुसऱ्याच्या मरणामुळं आनंदानं नाचणारे XXXXX नाही आहोत. आपण नाईलाज म्हणून तिकडं गेलोय याचा अर्थ आपण आपली मानवतेची विचारधारा सोडून दिलेली नाही. तुम्ही त्या भक्ताडांच्या पक्षासोबत आहात पण तुमचं मन तिथं नाही, ही खंत खाजगीत तुम्ही बोलून दाखवता. परवा-परवापर्यंत आपण एकत्र मिळून ही भक्तपिलावळ ठोकलेली आहे. तुम्हाला आदरणीय असलेले दादाही स्वखुशीनं तिकडं नाहीत हे अख्खा महाराष्ट्र ओळखून आहे. दादाच काय तिकडे गेलेल्या एकाही नेत्याला मनातून त्यांची संगत नकोशीच आहे, पण सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. असो. तुम्ही ज्या वेळेची वाट पहाताय, ती योग्य वेळ लवकर येवो.
…पण मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण हे महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक आहे. या बाबतीत आपण मुग गिळून गप्प बसणं म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी गद्दारी ठरेल, या मातीशी गद्दारी ठरेल, छत्रपती शिवरायांच्या विचारांशी गद्दारी ठरेल. हे तुम्ही मन मारून सहन केलंत, तर शिवशाहुफुलेआंबेडकरांचे नांव घेण्याचा अधिकार तुम्हाला राहणार नाही. मस्साजोग प्रकरणाबाबतीत तरी तुम्ही सगळ्यांनी मिळुन दादांवर दबाव आणायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं.
या प्रकरणात दादांचीही प्रचंड बदनामी होते आहे हे लक्षात घ्या. आजवर दादांवर पक्ष फोडला, काकांना सोडले हे आरोप साधे होते असं म्हणायची वेळ आलीय. सिंचन घोटाळ्यांच्या आरोपात तर आरोप करणार्यांनी त्या आरोपाची सुरळी करून स्वत:च्या तोंडात सारून घेतलेली आहे. पण आता दादांना आयुष्यभरासाठी एका माणसाची निर्घृण हत्या करणार्यांना पाठीशी घालण्याचा अतिशय किळसवाणा, घाणेरडा डाग लागणं तुम्हाला तरी पटणार आहे का? बघा. विचार करा. काल सरपंचांच्या लाडक्या लेकीनं एक आवाहन केलंय, ते आपल्या घरातली मुलगी म्हणून बघा.
बाकी कुणी मदतीला येवो न येवो, आम्ही लढत रहाणारच आहोत. छत्रपती शिवरायांशी आणि शंभूराजांशी कपट करणाऱ्या वृत्तीच्या वळचणीला जाण्याची वेळ वैऱ्यावरही येऊ नये, तुमच्यासारख्या दोस्तांवर ती आली. तरी दादांसाठी स्वत्वाचा त्याग केलात. दादा तुमच्यासाठी एवढं तरी करतीलच. बघा. प्रयत्न करा. बास एवढंच. जय शिवराय. जय भीम- किरण माने.”