या तारखेस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता
मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत असल्याने राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार येत्या २७ ते २८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शुक्रवार (दि.२७ डिसेंबर) रोजी दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर शुक्रवार रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार (दि.२८ डिसेंबर) रोजी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे.
एकंदरीत या दिवशी विदर्भात आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. तर रविवार (दि.२९ डिसेंबर) रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पाहायला मिळणार असून सोमवार (दि.३० डिसेंबर) पासून थंडीत वाढ होईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे देखील आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.