
नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवशी मंगळवारी (३० जुलै) भारताला दुसरे पदक मिळाले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. यासह मनू भाकरने इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने 2 पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. याआधी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या वोंहो ली आणि जिन ये ओह यांचा १६-१० असा पराभव केला.
पदक जिंकणारा सरबज्योत सिंग सहावा भारतीय नेमबाज
सरबज्योत सिंग आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा भारताचा सहावा नेमबाज ठरला आहे. त्याची जोडीदार मनू भाकर यापूर्वी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी भारतीय नेमबाज ठरली होती. मनू भाकरसाठी हे ऑलिम्पिक उत्तम ठरले आहे. काही दिवसांपूर्वी, 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत, मनू भाकर गेल्या 20 वर्षांत वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली.
मनूला आणखी एक पदक जिंकण्याची संधी
2004 मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुमा शिरूरने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. मनूला आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. ती 1 ऑगस्ट रोजी महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेणार आहे.