महाराष्ट्रराजकारण

जनतेचे आभार मानत भावी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्याकरता संविधान सगळ्यात महत्वाचं…

मुंबई : आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीतील सर्व नेत्यांनी मंजुरी दिली आहे. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आणि सर्व आमदारांचे, जनतेचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सगळ्यांचे आभार की, एकमतानं माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. ‘एक है, तो सेफ है’ हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो, त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो. भगवान बिरसाामुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन, आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो.”

“आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू, 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही, माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं, एक वर्ष फक्त 72 तासांसाठीच होतो, पण टेक्निकली मुख्यमंत्रीपदी होतोच, त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं… आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही, लार्जर इंटरेस्टमध्ये आपण एकत्र काम करू, कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरुद्ध होतात, तरीही लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळ्यांशी जुळवून घेऊ…”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button